आरजे मलिष्काला विखे-पाटलांचा सल्ला !

आरजे मलिष्काला विखे-पाटलांचा सल्ला !

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरजे मलिष्काच्या नव्या गाण्याचा उल्लेख करून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच विखे पाटील यांनी मलिष्काला एक सल्ला देखील दिला आहे. गेल्या वर्षी आरजे मलिष्काने म्हटलेल्या “मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?” या गाण्यामुळे शिवसेनेचा प्रचंड तिळपापड झाला होता. मलिष्काने काय चुकीचे म्हटले होते? असा सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

दरम्यान आता मुंबईतील खड्डे अन् पावसावर मलिष्काचे एक नवीन गाणे व्हायरल झाले आहे. “गेली गेली गेली…मुंबई खड्ड्यात”… यावर मला वाटतं, त्या मलिष्काला एकदा उर्वरित महाराष्ट्र फिरवून आणला पाहिजे… मग कदाचित ती गाण्यात थोडी दुरूस्ती करेल…“गेला गेला गेला… महाराष्ट्र खड्ड्यात”… असा सल्ला विखे पाटील यांनी मलिष्काला दिला आहे. तसेच  नवीन गाणे आल्यानंतर मलिष्काला धमक्या यायला लागल्या आहेत. शिवसेनेच्या विश्वासार्हतेवर मलिष्काने प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर तिचे काय चुकले? त्यामुळे मलिष्काला  असलेल्या धोक्याचा आढावा घ्या आणि आवश्यक असेल तर सुरक्षाही पुरवा अशी मागणी विखे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान शिवसेनेवर भरोसा ठेवायचा कसा? हा प्रश्न आता फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर आंध्रातील तेलुगू देसमलाही पडायला लागला असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तुम्हाला आठवत असेल, चार महिन्यांपूर्वी तेलुगू देसम जेव्हा एनडीएतून बाहेर पडली, तेव्हा शिवसेना काय म्हणाली होती? म्हणे, “तेलुगू देसमने शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन हा निर्णय घेतला”. आणि आता काय घडतंय? त्याच तेलुगू देसमने शिवसेनेच्या भूमिकेवर विश्वास ठेवून केंद्र सरकारविरूद्ध अविश्वास दाखल केला, तर हीच शिवसेना भाजपच्या गळ्यात गळे घालायला लागली असल्याची जोरदार टीकाही विखे पाटील यांनी केली आहे.

COMMENTS