भाजपमधील अंतर्गत संघर्ष वाढला, सुभाष भामरेंचं अनिल गोटेंना प्रत्युत्तर !

भाजपमधील अंतर्गत संघर्ष वाढला, सुभाष भामरेंचं अनिल गोटेंना प्रत्युत्तर !

धुळे – भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा वाढला असल्याचं दिसत आहे. आमदार अनिल गोटे यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तेलगीचे साथीदार आणि चार वर्षे तुरुंगात असताना तुम्हाला भाजपने तिकीट दिले. तसेच तुम्हाला ‘पवित्र’ करुन निवडून आणले असल्याचं वक्तव्य भामरे यांनी केलं आहे. अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अनिल गोटे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान धुळ्याच्या विकासासाठी माझ्या कारकिर्दीत सर्वाधिक निधी आला. रेल्वे मार्गाच्या मागणीबाबतही सरकारने न्याय दिला. तेव्हापासूनच विरोधकांकडून माझा राग होतोय. खासदार म्हणून मी माझे काम केले ही काय चूक झाली का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच भाजपात जातीयवाद नाही. मराठा आहे म्हणून पक्षाने तिकिट दिले नाही. धुळ्याच्या विकासासाठी मला संधी देण्यात आली. आवश्यक तेथे एखाद्या निष्ठवंतालाही पक्ष उमेदवारी देईल असंही यावेळी भामरे यांनी म्हटलं आहे.

तसेच गोटेंची लढाई निष्ठावतांसाठी नाही तर स्वतःला महापौरपदी विराजमान होण्यासाठीची आहे. ते शांत राहिले असते तर धुळ्याचे प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीष महाजन ‘त्यांच्या’ घरीही गेले असते. भाजपा निष्ठवंतांना टाळत नाही हा इतिहास असून महापालिका निवडणूक कार्यक्रमात मी कोण ढवळा ढवळ करणारा? असा सवालही भामरे यांनी उपस्थित केला आहे.

 

COMMENTS