राजू शेट्टींकडून कृषी बिलाची होळी

राजू शेट्टींकडून कृषी बिलाची होळी

कोल्हापूर : कृषी कायद्याच्या विरोथात मंगळवारी भारत बंदच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळला गेला. सर्व जनता शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी कायद्यांची होळी करून निषेध नोंदवला केली. दिल्लीत सुरु असलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा १३वा दिवस होता.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, सरकारने केलेले नवे कायदे शेतक-यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहेत. शेतक-यांना वा-यावर सोडणारे आहेत. त्यामुळे ते रद्द झाले पाहिजेत अशी मागणी करत कृषी कायद्यांची होळी केली. शिरोळ येथील आपल्या निवासस्थानाबाहेर त्यांनी या विधेयकाची होळी केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, कृषी कायद्यांच्या विरोधात मंगळवारी भारत बंद ची हाक देण्यात आली होती. त्याला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळला गेला. सर्व जनता शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जनता सोबत आल्यामुळे शेतक-यांना मोठा आधार मिळाला असून या लढाईमध्ये आपण एकटे नाही हेसुद्धा समजले असल्याचे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने शेतकरी प्रश्नांबाबत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ज्याची मागणीच केली नाही ते कायदे कशाला करता? कायदे करायचेच असतील तर सर्वच घटकांना सोबत घेऊन चर्चा करून कायदे करा. कडाक्याच्या थंडीत आणि काहीही सुविधा नसताना शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या हक्कासाठी लढत आहेत, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. सरकारने यावर विचार करून कायदे रद्द करावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

COMMENTS