राज्यपालांनी सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी,  भाजप खासदार नारायण राणेंची  मागणी !

राज्यपालांनी सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, भाजप खासदार नारायण राणेंची मागणी !

मुंबई – राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली आहे. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर गहिरं संकट आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत. आज नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्ण आणि मृत्यू वाढत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी याकडे गांभीर्याने पाहावं असं राणे यांनी म्हटलं आहे. काही सूचनाही केल्या. मनपा आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. अनेक रुग्णांना अॅडमिट न केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हे सरकार ही परिस्थिती हाताळू शकत नाही.हजाराच्या जवळपास मृत्यू झाले हे पाहता हे सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी अपयशी ठरलं आहे.

लष्कराच्या ताब्यात केवळ रुग्णालये नव्हे तर राज्य का देऊ नये? हे सरकार उपाययोजना करु शकत नाही, प्राण वाचवू शकत नाही. या सरकारची कोरोनाचा सामना करण्याची क्षमता नाही, त्यामुळे यांना नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी असंही राणे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS