एस.टी. महामंडळाला 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी !

एस.टी. महामंडळाला 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी !

मुंबई – एस.टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक या बसमधून प्रवास करत असतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५०० नवीन बसेस  खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२.५ कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, आज ही एस.टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राचा आधार आहे. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एस.टी बसमधून प्रवास करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे.  महामंडळाने ही पुढाकार घेऊन एस.टी बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

बैठकीत त्यांनी वर्धा, देवळी, सेलू, वडसा, गडचांदूर, कोरपना, नागभीड, चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभूर्णा, घुग्गूस, भद्रावती, राजूरा, चिमूर बस स्थानकांच्या कामांचा ही आढावा घेतला.वर्धा, देवळी,  मूल, बल्लारपूर, सावली, पोंभूर्णा, घुग्गुस, भ्रदावती, राजूरा चिमूर बसस्थानकाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चंद्रूपर, मूल, बल्लारपूर बस स्थानकांच्या कामाचे कार्यादेश ही देण्यात आले आहेत. उर्वरित स्थानकांच्या कामांना ही गती देण्यात यावी, ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे देण्यात आली आहेत त्यांच्याकडून स्थानकांच्या विकासाचे काम वेळेत आणि दर्जात्मक पद्धतीने करून घेण्यात यावीत अशा सूचनाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

 

COMMENTS