“गारपीटग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, अन्यथा आंदोलन करणार !”

“गारपीटग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, अन्यथा आंदोलन करणार !”

मुंबई – अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने राज्यातील काही भागांमधील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, 10 व 11 फेब्रुवारी रोजी विदर्भ-मराठवाड्यात राज्यात अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, गहु, हरभरा, तुर, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची ही पिके अक्षरश: जमीनदोस्त झाली आहेत. आधिच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील 356 गावांना या गारपिटीचा फटका बसला. तर वीज पडुन एकाच मृत्यू झाला आहे. राज्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बोंडअळीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत असतांना अचानक झालेल्या या गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारने कपाशीवर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही हे अनुदान शेकतऱ्यांना मिळाले नाही. सरकारच्या या घोषणेवर आता आमचा विश्वास नाही. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करण्या यावं असंही तुपकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS