काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरांचा शुभारंभ !

काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरांचा शुभारंभ !

पालघर – काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरांचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष असून २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असून भाजपच्या घरवापसीचे असणार आहे. केंद्रात आणि राज्यात परिवर्तन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केलं आहे. ते पालघर येथे आयोजित केलेल्या काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरात बोलत होते.

पालघर जिल्ह्यातील मनोर येथून काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय शिबिरांना सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शिबिराला सुरुवात झाली.  काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले.

राज्यात १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १ हजार ७५३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाच्या नावाखाली जबरदस्तीने शेतक-यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. शेतक-याची जात संपवण्याचा विडा भाजप सरकारने उचलला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. राज्यातील शेतक-यांचा, कष्टक-यांचा या सरकारवर विश्वास राहिला नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मोदी आणि फडणवीस निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरले आहेत. वर्षाला दोन कोटी नोक-या देण्याचे काय झाले? असे विचारले असता पंतप्रधान म्हणतात पकोडे विकणे हा रोजगार नाही का?, सुशिक्षित बेरोजगारांनी आता पकोडे विकायचे का? असा संतप्त सवाल खा. चव्हाण यांनी त्यावेळी केला. देशाचे संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव असून याविरोधात २६ जानेवारी रोजी काँग्रेस पक्ष राज्यभरातील सर्व जिल्ह्यात  संविधान बचाओ यात्रा काढणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यावेळी म्हटले आहे.

 

COMMENTS