आगामी खरीप हंगामासाठी बियाणं आणि खतांची मुबलक उपलब्धता- चंद्रकांत पाटील

आगामी खरीप हंगामासाठी बियाणं आणि खतांची मुबलक उपलब्धता- चंद्रकांत पाटील

मुंबई – आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणं आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पुर्तता केली जाईल, अशी माहिती दिली कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. तसेच पीक विम्यासाठी नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी मंत्रीमहोदयांनी केले.

कृषी व फलोत्पादन आणि कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव, तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकाऱ्यांसोबत खरीप हंगामासंदर्भात आज आढावा बैठक झाली. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा मा. मंत्रिमहोदयांनी घेतला. यावेळी कृषी राज्यमंत्री मा. श्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. पीक विमा नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपलं सरकार’ केंद्रामार्फत, किंवा कर्ज घेतलेल्या बँकांमार्फत 24 जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करावा, असे आवाहनही मा. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी पावसाचा अचूक अंदाज व जमिनीचा ओलावा विचारात घेऊनच पेरणीची प्रक्रिया सुरु करावी. तसेच, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अंतरपिके घेण्याला प्राधान्य द्यावे. शिवाय, खते आणि किटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा अशा सूचनाही मा. श्री. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत.

COMMENTS