भारत बंदला हिंसक वळण, एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी !

भारत बंदला हिंसक वळण, एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी !

मध्य प्रदेश – दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. परंतु या आंदोलनाला आता हिंसक वळण आलं असल्याचं दिसत असून मध्य प्रदेशमधील मुरैना येथे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुरैनासह ग्वाल्हेर तसेच सागर जिल्ह्यात कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी झालेल्या जाळपोळीमुळे अनेक जण जखणी झाले असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय दलित मंचाचे नेते आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ट्विटरवरुन बंदचे आवाहन केल्यानंतर देशभरातील दलित संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये दलित संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर व रेल्वे रुळांवर उतरले असल्याचं पहावयास मिळालं आहे.

दरम्यान मध्य प्रदेशमधील सागर व ग्वाल्हेर या भागातही जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ग्वाल्हेरमधील हिंसाचारात १९ जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर उत्तर प्रदेशमधील मेरठमध्येही जमावाने चार बसेस जाळल्या आहेत. एकूणच या बंदला हिंसक वळण प्राप्त झालं असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आंदोलकांना शांततेच आवाहन केलं आहे.

 

COMMENTS