तुमचे प्रश्न सोडवले नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही –अजित पवार

तुमचे प्रश्न सोडवले नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही –अजित पवार

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त खासदार आणि आमदारांना निवडून द्या. तुमचे सोडवण्यासारखे सर्व प्रश्न सोडवू आणि जर तुमचे प्रश्न सोडवले नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील जाहीर सभेने झाली.  या सभेत अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

साडेतीन वर्ष भाजप आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरु असून भाजप आणि शिवसेना ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी यावेळी केली आहे. तसेच देशात व राज्यात ‘अच्छे दिन’ आणतो म्हणून सत्तेत आलेल्या या भाजपने काय केले, याचे उत्तर द्यावे. तसेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतऱ्यांची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोपही यावेळी अजित पवार यांनी केला आहे.

COMMENTS