लातुरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तूर जाळली

लातुरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तूर जाळली

लातूर –  तूर खरेदी बंद झाल्याने राज्यातला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच आज (सोमवार) लातुरात तूर खरेदी केंद्र बंद केल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी चक्‍क तूरच जाळून आपला संताप व्यक्‍त केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

लातुरातील चाकूर आणि जळकोट येथील शेतकऱ्यांनी तूर जाळून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. हजारो क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. मुदत संपल्याने तूर खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या लातुरातील शेतकऱ्यांनी तूर जाळली.

शनिवारी मध्यरात्रीपासून नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यामुळं अडचणीत आलेला शेतकरी आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळं झोपी गेलेल्या सरकारला जाग आली असून, तूर खरेदीची मुदत वाढवण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दरबारी केली आहे. 22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या खरेदी केंद्रावर पोहोचलेल्या तुरीच्या खरेदीची मुभा देण्यात यावी अशी मागणी फडणवीसांनी केंद्राकडे केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने शेतरकऱ्यांचा जीव टांगणीलाच लागला आहे. दुसरीकडे, डाळीचे दर स्थिर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयात शुल्क वाढवण्याची सूचनाही केंद्र सरकारला केली आहे. मात्र तुरीच्या वाढीव उत्पादनाची कल्पना असूनही, खरेदीसंदर्भात योग्य तरतूद करण्यात फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरल्याचेच दिसून येते आहे.

दरम्यान, सरकारने आर्थिक नियोजन केलं नाही त्यामुळे सर्वांना झळ पोहचत आहे. तूर खरेदीबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर राज्यभर काँग्रेस आंदोलन करु असा इशार अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

COMMENTS