राज्यातील 95 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था हागणदारी मुक्त

राज्यातील 95 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था हागणदारी मुक्त

  •     2 ऑक्टोबर पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्तीच्या संकल्पपूर्तीकडे वाटचाल
  •     मुख्य सचिवांनी घेतला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

मुंबई – स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या शहरांच्या कामाचा आढावा मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज घेतला. राज्यातील जवळपास 95 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था हागणदारीमुक्त झाल्या असून उर्वरित 5 टक्के येत्या महिन्याभरात हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यातील सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करणे शक्य होईल,असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

 

मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नाशिक, अहमदनगर, बीड येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून या जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषद आणि आणि नगरपंचायतीच्या हागणदारमुक्तीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी हागणदारीमुक्तीसाठी शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नाशिक, अहमदनगर, बीड या 7 जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शौचालय बांधकामासाठी गती देण्याची गरज असून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.

 

वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामांवर भर देऊन सामूहिक शौचालये बांधल्यानंतर त्यांच्या स्वच्छतेची आणि देखभालीची दक्षता घ्यावी असे, निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले. 2 ऑक्टोबर 2017 रोजी राज्यातील सर्व शहरे हागणदारी मुक्तीचा संकल्प करण्यात आला आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.

 

COMMENTS