कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार – मुख्यमंत्री

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार – मुख्यमंत्री

मुंबई, 23 जुलै – शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीची प्रत्यक्ष कार्यवाही सुरुवात करण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यात येणार आहे.  ‘आपले सरकार’  या वेब पोर्टलच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यासाठी राज्यात 25 हजार केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक केंद्र असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जासोबत आधार क्रमांक,  बँक खात्याची माहिती,  कुटुंबाची माहिती व स्वघोषणापत्र द्यावे लागणार आहे.

राज्यात दुबार पेरणीचे संकट टळलेले असून जवळपास 88.3 टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तुर खरेदीबाबत माहिती सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, 3 हजार 341 कोटी 32 लाख रुपये म्हणजे सुमारे 93 टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे.

COMMENTS