सरकार पाडणारची टेप बंद करून जनहिताची कामे करा : केशव उपाध्ये

सरकार पाडणारची टेप बंद करून जनहिताची कामे करा : केशव उपाध्ये

मुंबई – सध्या राज्य शिवसेना-भाजपात ईडीच्या नोटीशीवरून राजकारण रंगलं आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीशीवरून भाजपाला धारेवर धरले आहे. भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असून, त्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप, संजय राऊत यांनी केला होता. त्याला भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात सरकार पाडणारची टेप बंद करून जनहिताची कामे करा असा सल्ला देण्यात आला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत शिवसेनेवर पलटवार केला आहे. “सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण चालवायला क्षमता लागते. क्षमता नसली ती सरकार पाडणार, सरकार पाडणार, सरकार पाडणार अशी टेप सारखी लावली जाते. सत्तेवर आहात तर जनहिताची कामे करा. गोरगरिबांना पॅकेज नाही. शेतकऱ्यांना मदत नाही. सरकार पाडणारची टेप बंद करून या प्रश्नांवर काही कृती करा,” असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले होते. भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी दबाब आणला गेल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील २२ आमदारांनाही धमकावलं जात असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. तसेच सामनाच्या आग्रलेखात भाजपवर टिका करण्यात आली होती.

COMMENTS