तो घातपातच होता – नितीन राऊत

मुंबई: गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील बहुतांश भागात अचानक वीज गेली होती. यामध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘तो घातपातच होता’, असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे.

12 ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईत सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका लोकल, रुग्णालये, शेअर बाजार व अन्य सेवांना बसला होता. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. यामागे काही घातपाताचा संशय असावा, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळं ही शक्यता खरी ठरली आहे. त्या ‘पावर कट’मध्ये चीनचा हात होता. गलवान खोऱ्यातील संघर्षाची किनार या घातपातास होती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

नितीन राऊत यांनी आज त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्य सरकारनं त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तेव्हा मला वेड्यात काढण्यात आलं होतं. पण काहीतरी गडबड आहे ही शंका आम्हाला आली होती. त्यामुळं आम्ही तात्काळ ऊर्जा विभागाची चौकशी समिती स्थापन केली होती. राज्य वीज नियामक आयोग व केंद्रीय वीज प्राधिकरणानंही समिती स्थापन केली होती. सायबर सेललाही तक्रार करण्यात आली होती. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आज तो अहवाल ऊर्जा विभागाला देणार असून त्याबाबत सविस्तर निवदेनही केलं जाईल’ असं राऊत यांनी सांगितलं.

COMMENTS