त्यामुळे महाशिवआघाडीच्या नेत्यांची राज्यपालांसोबतची बैठक ढकलली पुढे!

त्यामुळे महाशिवआघाडीच्या नेत्यांची राज्यपालांसोबतची बैठक ढकलली पुढे!

मुंबई – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते. परंतु महाशिवआघाडीच्या नेत्यांची आजची राज्यपाल भेट पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक खर्च सादर करण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने बहुतांश नेते त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे ही भेट पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यानुसार भेट पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही बैठक आता कधी होणार याबाबतची माहिती समजू शकली नाही.

दरम्यान आजच्या बैठकीत परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी महाशिवआघाडीचे नेते करणार होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र मदतीबाबत अजून ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी या भेटीत करण्यात येणार होती.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सरकारी कामकाज जवळपास बंदच आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी या मागणीसाठी ही भेट असणार आहे. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना अजूनही कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. नुकसानीचे पंचनामे ही अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मदत मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्याला आहे. हातची आलेली पीकं तर गेलीच पण नवीन पिकांची लागवड करण्यात ही उशीर झाला आहे. त्यामुळे महाशिवआघाडीने अजूनही सत्तास्थापनेचा दावा केला नसला तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या तिनही पक्षाचे नेते एकत्र राज्यपालांची भेट घेणार आहेत.

COMMENTS