सरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफाम – सचिन सावंत

सरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफाम – सचिन सावंत

मुंबई – राज्यभरामध्ये अतिरेकी कारवाया करणा-या सनातन संस्थेशी संबंधित अनेक जणांना रंगेहात पकडले असतानाही सनातन संस्था आणि त्यांच्या प्रमुखांवर अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून २००८ साली झालेल्या बॉम्ब स्फोटात सनातनच्या साधकांचा हात होता हे पुढे आणले आहे. असे असतानाही राज्य सरकार तर्फे या संस्थेला पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. उलट संस्थेशी संबंधित लोकांनी इंडिया टुडेच्या पत्रकारांचे फोटो समाज माध्यमांवर टाकून त्यांना अतिरेकी घोषीत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हा संपूर्ण प्रकार घृणास्पद व निषेधार्ह असून मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादामुळेच कट्टरतावादी बेफाम झाले आहेत. असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबईजवळ नालासोपारा येथे सनातनच्या साधकाकडे जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणा-या साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सनातनच्या काही साधकांना अटकही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने आरोपींचा मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा कट होता हे स्पष्ट आहे. याचे धागेदोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बड्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सखोल चौकशी झाल्यास अनेक बड्या लोकांवर कारवाई होऊ शकते. असे झाल्यास भाजप सरकार हिंदू विरोधी आहे असा संदेश जाईल म्हणून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या तपासावर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधानांच्या सांगण्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी जाणिवपूर्वक तपास धीम्या गतीने करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत असे वृत्त इंडिया स्कूप या वेबसाईटने दिले आहे. त्यामुळेच इतके पुरावे हातात असतानाही सनातन संस्थेवर बंदी घालण्याकरिता सरकारने कोणतेही पाऊल टाकले नाही. उलट संस्थेच्या विरोधात आवाज उठवणा-या व्यक्तींना धमक्या आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जात आहे. इंडिया टुडेच्या पत्रकारांना समाजमाध्यमांद्वारे अतिरेकी घोषीत करून समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारच्याच पाठिंब्यामुळे राजरोसपणे हा भयंकर प्रकार सुरु आहे. दुसरीकडे पोलिसांचा वापर करून सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणा-यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर सुरु आहे. काँग्रेस पक्ष या प्रकाराचा तीव्र निषेध करत असून याविरोधात कारवाईची मागणी करत आहे असे सावंत म्हणाले.

COMMENTS