मुंबईत नाशिक पॅटर्न राबविण्याचा राज ठाकरेंचा सल्ला

मुंबईत नाशिक पॅटर्न राबविण्याचा राज ठाकरेंचा सल्ला

मुंबई – दादरचे शिवाजी महाराज पार्क या मैदानाला देखभालीसाठी दररोज हजारो लिटर पाणी लागते. मुंबई महापालिका आता ४ कोटी रूपये खर्च करून याठिकाणी जलसंचयनाचा प्रकल्प सुरू करत असून महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता याठिकाणी नाशिक महापालिकेसारखेच सीएसआरचे मॉडेल राबवावे अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.

मुंबई महापालिकेला शिवतीर्थाची देखभाल करण्यासाठी दररोज हजारो लिटर पाणी लागते. महापालिकेच्या पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा याअनुषंगानेच जलसंचयनाचा प्रकल्प हा मनसेच्या नगरसेवकाने सुरू केला होता. माझे नगरसेवक होते तोवर हा प्रकल्प व्यवस्थित सुरू होता. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत होती. २०१७ नंतर मात्र हा प्रकल्प बंद झाला, किंबहुना दुर्लक्षित झाला. मुंबई महापालिका हा जलसंचयनाचा प्रकल्प पुन्हा सुरू करत असल्याचे महापालिकेचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाला ४ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. २०१२-२०१७ या कालावधीत नाशिक महापालिकेत सीएसआरच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकल्प राबविले. त्याच धर्तीवर शिवाजी पार्कातील प्रकल्पही राबवावा अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच सध्याची निविदा प्रक्रिया थांबवावी याकडे त्यांनी महापालिकेचे लक्ष वेधले आहे.

COMMENTS