“उद्यापर्यंत अध्यादेश काढला नाही तर आमदारकीचा राजीनामा”

“उद्यापर्यंत अध्यादेश काढला नाही तर आमदारकीचा राजीनामा”

औरंगाबाद – आरक्षणासाठी मराठा समाजाचं राज्यभरात जोरदार आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यात उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता मराठा आमदारही आरक्षणासाठी आक्रमक होत असल्याचं दिसून येतंय. शिवसनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारला आरक्षणाचा अध्यादेश तातडीनं काढण्याची मागणी केली आहे. उद्यापर्यंत अध्यादेश काढला नाही तर राजीनामा देण्याचा इशाराही जाधव यांनी दिला आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकार चालढकल करत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. सर्व प्रकरण न्यायालयावर आणि आयोगावर टाकून सरकारला यातून पळ काढता येणार नाही. विधीमंडळाला काही अधिकार आहेत की नाही असा सवालही जाधव यांनी केला आहे. आंदोलनादरम्यान काल मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या कुटुंबियाला 5 लाखांची मदत करणार असल्याचंही जाधव यांनी सांगितलं. तसंच सरकारने शिंदे यांच्या कुटुंबियाला 50 लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही जाधव यांनी केली आहे.

COMMENTS