राज्यपाल घटनेची पायमल्ली करत आहेत का ?

राज्यपाल घटनेची पायमल्ली करत आहेत का ?

मुंबई – मंदिर खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये मंदिरं खुली का केली जात नाहीत असा सवाल केला आहे.  राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा आणि त्यांना दिशादर्शन करण्याचा नक्कीच अधिकार आहे. मात्र राज्यपालांनी पत्रामध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावरुन राज्यपालांकडून राज्यघटनेची पायमल्ली होत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, तुम्ही हिंदुत्वाद विसरला आहात काय ? तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहात काय ?  घटनात्माक पदावर असलेल्या व्यक्तीनं अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे. धर्मनिरपेक्षता हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. धर्मनिरपेक्षता राज्यपालांना मान्य नाही का ? राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना घटनेपप्रमाणे वागा असा सल्ला देऊ शकतात. उलट ते तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहात काय ? असा सवाल करत असतील तर ते घटनेची पायमल्ली ठरु शकत नाही का असाही प्रश्न उपस्थित होतोय.

दुसरीकडे भाजपने आज म्हणज्ये 13 ऑक्टोबर रोजी मंदिरं खुली करण्यासंदर्भात राज्यभर आंदोलने कऱण्याचा निर्णय घेतला आहे. आणि राज्यपालांनी 12 ऑक्टोबरला हे पत्र लिहलं आहे. हाही विलक्षण योगायोग आहे असंचं म्हणावे लागेल. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांन पाठवलेल्या पत्रासोबत मंदिरं खुली करण्यासंदर्भातील मागणी करणारी विविध संघटना आणि पक्षांची पत्रे जोडली आहेत. ही तीनही पत्र भाजप संबंधित संघटना आणि पक्षाची आहेत. यावरुन राज्यपाल हे भाजपची लाईन चालवत आहेत का असाही प्रश्न पडला आहे.

पाहा राज्यपालांचं जशास तसं पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र वाचा जशास तसं

माननीय राज्यपालमहोदय , महाराष्ट्र राज्य यांसी –
जय महाराष्ट्र ,

महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही .
Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.

आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो.

जय हिंद , जय महाराष्ट्र .
आपला नम्र –
उद्धव ठाकरे.

COMMENTS