महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, सरकारच्या पॅकेजवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया!

महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, सरकारच्या पॅकेजवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया!

मुंबई – पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.
या बैठकीत पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्रानं अजूनही ही रक्कम दिली नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सरकारच्या या पॅकेजवर विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे.बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

तसेच नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय्.पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

COMMENTS