साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – धनंजय मुंडे

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – धनंजय मुंडे

परळी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देत साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अजरामर कार्यासाठी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी मागणी करत आपण त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे. तसेच राज्य सरकारने केंद्राकडे याबाबतचा ठराव पाठवावा याबाबत आपण मागणी व पाठपुरावा करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

पीडित – शोषितांचा आवाज आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करणारे थोर समाजसेवक, लेखक – कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज शंभरावी जयंती. त्यांच्या विचारांचा वारसा आपण त्यांचे सच्चे अनुयायी बनुन अखंडपणे तेवत ठेवू. साहित्यरत्न यांना भारतरत्न देण्यात यावा, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करणार आहे, असे यावेळी मुंडे यांनी पोस्ट केलेल्या व्हीडिओ मध्ये म्हटले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने अधिकृतपणे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाईल याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

COMMENTS