खोटं बोलत असेन तर भर चौकात फाशी द्या – धनंजय मुंडे

खोटं बोलत असेन तर भर चौकात फाशी द्या – धनंजय मुंडे

नवी मुंबई – नव्वद हजार कोटींचा घोटाळा पुराव्यानिशी राष्ट्रवादीने काढला आहे. त्याची चौकशी करत नाहीत. उलट मोदी आणि देवेंद्र फडणवीस बोलतात आमच्यावर आरोप नाहीत. त्यामुळे हे देवेंद्र फसवणीस असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. आपण 16 मंत्र्यांवर केलेला आरोप सिद्ध झाला नाही तर भर चौकात फाशी द्या, असे आवाहन विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नवी मुंबईतील निर्धार परिवर्तन मेळाव्यात केले आहे.

मुंडे पुढे म्हणाले की, यांनी व्यापक असे अनेक राफेल घोटाळा केले. शिवसेना लाचार होऊन तुकड्यावर सोबत आहे. एकमेकांवर टीका करून परत सोबत देतात. याला गल्लीतील कुत्र्यांची भांडणं असा दाखला मुंडे यांनी दिला. खायला मिळत नाही म्हणून हे भांडण आहे, असे ते म्हणाले.

लहान लेकरांच्या चिक्कीतही पैसे मारले

माझे पुरावे खोटे ठरले तर मी कोणत्याही चौकात फाशी घ्यायला तयार आहे. देसाई यांनी उद्योगाची जमीन राखीव करण्यासाठी 40 हजार कोटी घेतले. 16 मंत्र्यांचा 90 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार पुराव्यानिशी सिद्ध केला. सामाजिक न्याय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये पैसे खाल्ले, आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी लोकांसाठीच्या साहित्यात पैसे खाल्ले. अहो या लोकांनी लहान लेकरांच्या चिक्कीतही पैसे मारले. आणि कसला तुमचा पारदर्शी कारभार? असा सवाल केला.या सोळा जणांची चौकशी लावा. या पैशावर निवडणुका जिंकत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

शिशुपालासारखे तुमचे 100 अपराध भरले आहेत

समाजातला एकही घटक तुमच्यावर खुश नाही, शिशुपालासारखे तुमचे 100 अपराध भरले आहेत त्यामुळे तुम्ही आता एकत्र लढा की वेगळे लढा तुमचे पानिपत अटळ आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपा शिवसेनेच्या सरकारवर हल्लाबोल केला. पाच दिवस उलटूनही बेस्टचा संप सुरूच आहे. प्रवासासाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. काय करतेय पालिका, परिवहन खातं? कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहील. प्रसंगी रस्त्यावरही उतरेल असा इशारा त्यांनी दिला.

लोकांना रेशनवर धान्य मिळत नाही आणि हे ऑनलाईन घरपोच दारू विकायला निघाले आहेत.  जमीन विकून मिळालेला पैसा खिशात राहत नाही, पावडर खाऊन कमावलेली बॉडी कधी टिकत नाही, आणि लाटेत निवडून आलेला आमदार पुन्हा कधी निवडून येत नाही. अशा शब्दात भाजपाच्या लाटेची खिल्ली उडवली.

COMMENTS