…तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून दोन हात करेल – धनंजय मुंडे

…तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून दोन हात करेल – धनंजय मुंडे

बीड – जिल्ह्यात गंभीर दुष्काळ असताना झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची व्यथा मांडली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करत जिल्ह्यांतील तसेच राज्यातील घडामोडींवर चर्चा करताना सरकारचे कान उपटले.

दरम्यान मुंडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सामान्य जनतेच्या हिताच्या विविध 25 मागण्या केल्या आहेत. या शिष्टमंडळात धनंजय मुंडे माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक नेते संदीप क्षीरसागर, सतीश शिंदे, रेखाताई फड, अशोक डक, फारूक पटेल, दिलीप भोसले आदी उपस्थित होते.

कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत मिळावी,  मागेल त्याला चोवीस तासात टँकर मिळावे, पशुधनाला चारा आणि प्यायला पाणी मिळण्यासाठी अजून कोणतीही उपाययोजना नाही त्यावर त्वरित निर्णय घ्यावा. प्रस्तावित दुष्काळी आराखड्यात मागणी असून एकाही विंधन विहिरीचे बांधकाम झालेले नाही.  मनरेगाचे कोणतेच काम जिल्ह्यात सुरु नाहीत. मागेल त्याला सरकारने काम उपलब्ध करून घ्यावे. बीड जिल्ह्यात कॅनॉलच्या काठचा ऊस पाण्याअभावी वाळत आहे. शेतकऱ्यांच्या तलाव / विहिरींवरील कृषी पंपांची वीज जोडणी तोडली जात आहे त्यामुळे या सर्वांचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. हे कमी की काय तर महावितरणकडून वीज बिल भरले नाही म्हणून पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडले जात असल्याच्या तक्रारी व मागण्या त्यांनी केल्या.

पीक विम्याचे पैसे प्रशासनाने बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा केले आहेत असे प्रशासन म्हणत आहे. मात्र, जिल्हा बँक कोणालाच पैसे वाटप करत नाहीये. हाच प्रकार बोन्डअळी मदतीबाबत जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक करत आहेत. हे कमी की काय पुरवठा विभागाने स्वस्त धान्याच्या दुकानातील पुरवठ्यात ७५% कपात केल्याची माहिती समोर येत आहे. मार्चच्या दरम्यान जेव्हा ऊस तोडणी कामगार पुन्हा परत येतील तेव्हा या मुद्द्यावरून मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो अशी भीती मुंडेंनी यावेळी व्यक्त केली.

नगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी बीड, धारूर, वडवणी आणि परळी वैजनाथ या चार तालुक्यातील शेतजमीन शासन पोलिस बळाचा वापर करून अधिग्रहित करत आहे. केंद्राची दुष्काळ संहिता इतकी क्लिष्ट आहे की साक्षात आर्यभट्टालासुद्धा त्यातले गणित सुटणार नाही. त्यामुळे कसलीच वाट न बघता तहानलेल्या पाणी आणि भुकेलेल्या व्यक्तीला अन्न पुरवठा तर पशुधनाला चारा पाणी देण्याची सरकारची जबाबदारी असे त्यांनी बजावले.

नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून मुंडेंनी केली टोलेबाजी

आज काही कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि पुण्यात आलेले होते. याचाच धागा पकडून धनंजय मुंडे म्हणाले की “आजवर ज्या कामांचे भूमिपूजन मोदीजींनी केले आहे त्यातले कोणतेही काम पूर्ण होणे तर सोडा साधे ते काम सुरु देखील झालेले नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक असो वा इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक असो त्या ठिकाणी अजून एक इंच खडीही टाकलेली नाही. थोडक्यात “जिस काम को मोदीजी हात लगाते हैं वो काम होता ही नहीं” असा टोला ना. धनंजय मुंडेंनी लगावला. भूमीपूजना ऐवजी त्यांनी राज्यातील दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी करायला हवी होती मात्र त्यांना शेतक-यांच्या दुःखाशी घेणेदेणे नाही असा टोला लगावला.

फसवे मुख्यमंत्री म्हणत फडणवीसांच्या कारभाराची केली पोलखोल

मध्य प्रदेशात कमलनाथांनी केवळ काही तासांत कर्जमाफी केली. मात्र, महाराष्ट्रात किती जणांना कर्जमाफी मिळाले ह्याची यादी मुख्यमंत्री देऊ शकत नाहीत. तीन वर्षे अभ्यास करून इथे जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी होती. मुळात दोन व्यक्तींच्या ईच्छाशक्तीतील फरक म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

गेल्या महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात चार तासांची बैठक घेतली होती. मात्र, त्यांचे इथले आमदार, पालकमंत्री तर सोडा साधे अधिकारीही ऐकत नाहीत. एक साधे उदाहरण म्हणजे इथले अर्धवट बांधलेले कोणतेचे बंधारे पुन्हा बांधायला घेतलेले नाहीत. तसेच, सन २०१५-१६, २०१६-१७ मध्ये अधिग्रहित केलेल्या विहिरींचा मोबदला संबंधितांना दिलेला नाही.

सध्या केवळ १०० टँकरची परवानगी दिलेली आहे, जी की खूपच कमी आहे. इथल्या पालकमंत्री स्वतःला ऊसतोड मजुरांच्या नेत्या म्हणवतात पण गेल्या चार वर्षांत त्यांनी याबाबत काय केले? ऊसतोड मजुरांपैकी किती जणांच्या हातातील कोयता कमी झाला? मजुरांचे जीवनमान उंचवण्यासाठी कोणत्या योजना राबविल्या? असा सवालही मुंडेंनी यावेळी विचारला.

जर बीडच्या पालकमंत्री, आमदार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाने सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना वेळीच दिलासा दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारशी याविषयी रस्त्यांवर दोन करेल असा कडक इशारा मुंडेंनी दिला. सोबतच आमच्या ताब्यातील संस्थांच्या माध्यमांतून सामान्य जनतेला सर्वोतोपरी दिलासा देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही मुंडेंनी दिली.

COMMENTS